बडबड गीत

"ये रे ये रे पावसा" किंवा "झुक झुक झुक आगिन गाडी" अशी कितीतरी दुर्मिळ बडबड गीतं ऐकून बराच काळ झाला. ते प्राथमिक शाळेतले दिवस! आहा! आजूनही ते क्षण डोळ्यासमोर आहेत.  बघता बघता १२-१५ वर्ष उलटून गेली पण तरिही सगळं अगदी काल घडल्यासारखे स्पष्ट आठवतय. ते शाळेतले गुरूजी, त्यांचा तो प्रेमळ स्वभाव, अगदी स्वतःची मुलं असल्यासारखे केलेले प्रेम आठवून खरच कंठ दाटून येतो! आजही  प्राथमिक शाळेतले शिक्षक दिसले की नकळतच चेहर्‍यावर स्मीतहास्य येते. खरच ते क्षण "लय भारी" होते. पण खरच ते दिवस आणि आज जे काही अनुभवायला मिळतय यात किती फरक पडलाय नाही?मी एका छोट्या गावात राहतो. "खेड्याकडे चला" चे उत्तम उदाहरण म्हणजे माझे गाव. काहिही सुविधा नसलेले माझे गाव आज एका "शहरा" इतके प्रगत झाले आहे पण त्यातली पोकळी आत्ता थोडी थोडी बाहेर यायला लागली आहे.

माझ्या गल्लीत जवळपास पाच ते दहा वयोगटातली जवळ जवळ ८-१० बारकी आहेत. त्यांना "वानरसेना" म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सध्या नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर त्यांचा चिवचिवाट सुरू असतो. एकदा शांत बसून त्यांची बडबड ऐकली तर खरच खुप मजा येते. त्यांचे ते बोबडे बोल ऐकून नकळत आपणही मनात बोबडे बोलायला लागतो :).

परवा असाच पुस्तक वाचत बसलो होतो. नेहमीप्रमाणे सगळी वानरसेना गल्लीभर चिवचिवाट करत सुटली होती. मी पुस्तक ठेवलं आणि हळूच खिडकीतुन त्यांची मजा पाहायला लागलो. साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी त्यांचा सेनाप्रमुख मोठ्याने ओरडला "ए पकला-पकली बास झाली आता. आता आपन शाला-शाला खेलू". म्हटलं चला आता फुल टू करमणूक होणार. त्यांचं ते "शाला-शाला" सुरू झालं. अ-ब-क-ड चा तास संपला आणि "बडबडगीतांचा" तास सुरू झाला.

पहिलं बडबडगीत ऐकताच मी हदरलो. आपेक्षेनुसार ते "झुक-झुक-झुक आगिनगाडी" किंवा "येरे येरे पावसा" किंवा फारफार तर "चांदोमामा चांदोमामा लपलास का" वगैरे एखादे असेल पण ही पोरं मोठमोठ्याने "शीला शीला की जवानी" म्हणायला लागली.दोन मिनिट मी सुन्नच झालो. त्यानंतरच त्यांच गाणं होतं "मुन्नी बदनाम हुई, दालिंग तेले लिये".  अरे हा काय प्रकार आहे? ही कसली बडबड गीतं??माझ्या मनाची चक्र वेगानं फिरू लागली....

ज्यांना साधा शेंबुड पुसता येत नाही अशी ही यंग जनरेशन खरोखरच कसले संकेत देत आहे? खरच यात त्यांचा काही दोष आहे? नाही. दोष आपला आहे. म्हणतात ना जे पेराल तेच उगवते! मग त्यांचा दोष तो कोणता? मध्यंतरी काही कामाकरिता माझ्या जुन्या शाळेत जाऊन आलो. अगदी मोजके जुने शिक्षक राहिलेले. बाकी सगळा स्टाफ नवा, २५-३० वयोगटातला. स्टाफरूममध्ये डोकावलं तर निम्मे अर्धे मोबाईलमध्ये गुंग, एकिकडे वर्ग चालू तर दुसरीकडे यांचे मोबाईल. आज सर्रास मोबाईल फोन वापरात आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सोबत मोबाईल ही देखिल मुलभुत गरज बनली आहे पण म्हणून काय तो या विद्येच्या मंदिरातही गरजेचा आहे? सहज माझ्या एका जुन्या शिक्षकांशी बोलत असताना "शीला,शीला की जवानी" गाणं सुरू झालं. बोलता बोलताच सरांच एकदम लक्ष विचलीत झालं आणि मला त्यांनी मान डोलावून डोकावायला सांगितल. मी सहज काचेतुन डोकावलं तर ती एका मास्तरांच्या मोबाईलची रिंगटोन होती.

आत्ता त्या घटनेची लिंक लागली . जर विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे गुरुजीच केंदाळात वावरत आहेत तर मग त्यात स्वच्छता, निर्मळता कशी राहिल? जणू एखाद्या वादळाच्या वेगाने ही नवी जनरेशन गोष्टी आत्मसात करत असताना त्यांना जर योग्य दिशा दाखवणारेच दिशाभूल होण्यास कारणीभूत असतिल तर खरच ही नींदनिय बाब आहे. केवळ गुरुजीच नव्हे, तर करिअरच्या मागे लागलेले पालकही याला तितकेच जबाबदार आहेत. हा बडबडगीतांचा प्रकार केवळ एक ट्रेलर म्हणाल तरी हरकत नाही.

"क्या हम गलफ्रेंड-बॉयफ्रेंड है" ही मॅकडोनलची जाहिरात कित्येकांना भावली. फेसबुक,ऑर्कुटवर जो-तो उठून "wow! so cute" किंवा "how nice!!" सारख्या उपमा देत ही जाहिरात शेअर करत होता पण जर खरच विचार केलात कधी? गलफ्रेंड, बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कधी कळाले ते आठवू शकाल? फार फार तर ५-७ वर्षापुर्वीपासून हे शब्द so called high सोसायटीतून आज खेड्या-खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. आणि आपण या अशा संस्कृतीची जाहिरात करून नेमकं आपल्या नव्या जनरेशनला काय शिकवू पाहतोय? यावरच एक किस्सा सांगतो. मध्यंतरी एका लग्नानिमित्त सर्व लोक एकत्र आलो होतो. बरेच पाहुणेमंडळी बर्‍याच दिवसांनी एकत्र भेटले होते त्यामुळे गप्पांना उत आला होता. बोलता बोलता बरेच विषय निघत गेले. त्यात हा विषय आला. एक बाई आगदी अभिमानाने म्हणाल्या,
"अहो ऐका हा किस्सा. आमच्या विकीचा (मुलाचे नाव महेश.पण तरिही विकी. का कोणास ठाऊक!) फक्त ८ वर्षाचा आहे. परवा काय म्हणाला माहितिये? त्याच्या बाबाला म्हणाला, ’ए बाबा. आपण आणखी एक घर आणि गाडी घेउयात की’, मग आम्ही आश्चर्याने विचारले, ’का रे? एकदम का तुला सुचलं?’ तर म्हणतो कसा , ’काही दिवसांनी माझी गर्लफ्रेंड येईल. मग आम्ही दुसरीकडे राहायला जाणार. मग आम्ही तुम्हाला हॉलिडेज मध्ये भेटायला यायला गाडी पाहिजेकी’. हा हा हा! ऐकलतं म्हणतो कसा! कित्ती गोड बाळ माझं"

???गोड???नेमकं यात यांना त्याचा अभिमान वाटण्यासारखे दिसले तरी काय?? आजून चड्डी घालता येत नसलेलं शेंबड मुल आत्तापासूनच; वयाच्या ८व्या वर्षा पासूनच "वेगळ राहणार, गर्लफ्रेंड फिरवणार, कधीतरी हॉलिडेजनाच भेटायला येणार" म्हणतोय आणि हे लोक ते अभिमानाने चारचौघांना सांगताहेत??आणि ते ही त्याच्या समोरच??

खरच यावर प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. मला अत्तापासूनच भिती वाटायला लागलिये की उद्या माझा मुलगा/मुलगी कोणालाही हाताला धरून घरी घेऊन येईल आणि म्हणेल "हे डॅड! लूक! ही इज माय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड. मी याच्याशी लग्न करणारे. तुमची परवानगी असेल तर नाईस, नसेल तर आम्ही पळून जायचं ठरवल आहे!" आत्ता हे मजेशीर वाटतयं पण प्रत्यक्षात कधी घराघरांत उतरेल काही सांगता येत नाही.

तेवढ्यात "ससा ले ससा,कापूस जसा" गाणं ऐकू आलं आणि भानावर आलो. कदाचित चुकल्या-चुकल्यासारखं काहीसं ऐकू आल्याने तंद्री भंग झाली असेल ! :) पण असो, काही का होईना आमच्यावेळच निदान हे तरी बडबडगीत या वानरसेनेच्या तोंडून ऐकायला मिळालं! पण तरिही जे काही या दरम्यान मनात येऊन गेलं ते बैचेन करण्यालायक नक्कीच होते.

-अद्वैत
माझा हा लेख या आधी येथे प्रकाशित:  http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=525

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर